सरकारच्या 5 वर्षांतील चुकांनाही राजीव गांधी जबाबदार का? – कॉंग्रेसचा मोदींना सवाल

12

राफेल प्रकरणी चर्चा करण्याचे आव्हान

नवी दिल्ली – भारताचे दिवंगत पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केल्यानंतर आता कॉंग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. गेल्या 5 वर्षांतील सरकारच्या चुकांनाही राजीव गांधी जबाबदार आहेत का?’ असा सवाल करत कॉंग्रेसने मोदींवर निशाणा साधला आहे.

कॉंग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी पत्रकार परिषद घेत मोदींच्या टीकेला उत्तर दिले आहे. गेल्या 5 वर्षांतील सरकारच्या गैरकारभारालाही राजीव गांधीच जबाबदार आहेत का? असा प्रश्न विचारत खेडा यांनी मोदींवर तोफ डागली आहे. शिवाय, कॉंग्रेस पक्ष बोफोर्सप्रकरणी चर्चेला तयार आहे. त्याप्रमाणे मोदींनीही राफेल प्रकरणी चर्चा करण्याचे आव्हान त्यांनी मोदींना केले आहे.

कॉंग्रेसने राजीव गांधींच्या नावे निवडणूक लढवावी असे आवाहन काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी केले होते. तसेच बुधवारी झालेलया एका प्रचारसभेत मोदींनी सुट्टीसाठी राजीव गांधी यांनी पंतप्रधानपदी असताना युद्धनौका वापरल्याची टीका केली होती. त्यावर कॉंग्रेसकडून प्रत्यूत्तर देण्यात येत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही “हयात नसताना राजीव गांधी यांच्यावर टीका होणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. “राजीव गांधींचा मृत्यू क्‍लेशदायक होता. गांधी परिवाराने दोन पंतप्रधान देशाला दिले. दोघांचीही हत्या झाली. एवढा मोठा त्याग या परिवाराने केल्यानंतर नरेंद्र मोदींची अशी भाषा अशोभनीय आहे. आपण पंतप्रधान पदावर आहोत. या पदावर असताना अधिक काळजी घेणे आवश्‍यक आहे. मात्र अशी काळजी न घेता अशा प्रकारची भाषा मोदींकडून बोलली जात आहे, हे दुर्दैवी आहे, असे पवार म्हणाले होते.